ईश्वराचा शोध..!

 एक म्हातारी आजीबाई होती. ती दररोज शिवणकाम करत असे. नेहमी काहीतरी शिवत असे. म्हातारीचे शिवणकाम चालते, हे सर्वाना माहित होते. 
      एका दिवशी संध्याकाळची वेळ होती. सुर्य मावळला होता. संघीप्रकाश कायम होता. घरातले दिसत नसले तरी अंगणातले मात्र दिसत होते. आणि अंगणभर फिरुन ही आजीबाई काहीतरी शोधत होती.
     म्हातार्‍या आजीचे काहीतरी हरवले आहे. ते शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. हे काही लोकांनी पाहिले. ते आजीजवळ आले आणि त्यांनी तिला विचारले,  आजीबाई तुम्ही या अंगणात काय शोधताय? आजीने त्यांना सांगीतले की, ती शिवणकाम करत होती आणि काम करता करता तिच्या हातून सुई पडली. पडलेली सुई शोधण्याचा ती प्रयत्न करत होती.
        लोकांनी सुई शोधायला सुरुवात केली. अंगणभर त्यांनी सुई शोधली पण सुई काही सापड्ली नाही. शेवटी थकुन ते आजीबाई जवळ आले आणि सुई नेमकी कुठे पड्ली ते विचारले.
    म्हातारी म्हणाली, सुई घराच्या आतमध्ये पडली होती. परंतू घरात खुप अंधार आहे. अंधारात सुई शोधणे शक्य नाही. म्हणुन मी अंगणात, उजेडात सुई शोधत होती. लोकांनी कपाळावर हात मारुन घेतला. म्हातारीला वेड लागले असे म्हणुन तेथून ते लोक निघुन गेले.
      आम्ही माणसे या म्हातारी प्रमाणेच वागत नाही काय? संत महात्म्यांनी सांगुन ठेवले. ईश्वर मनुष्याच्या आत आहे. तो मनुष्याच्या हृदयामध्ये बसतो. पण आत शोधणे कठीण. बाहेर  अंगणात शोधणे सोपे. म्हणुन मग आम्ही ईश्वराला, मंदिर, मस्जिद, चर्च, मध्ये शोधतोय. दगड आणि मुर्तीमध्ये शोधतोय. पण म्हातारीची सुई जर घरात पडली असेल, तर ती अंगणामध्ये सापडू शकत नाही, हे आम्हाला पटकन लक्षात येते. परंतू मानवाला हृदयात राहणारा ईश्वर,  मंदिर-मस्जिद - चर्च दगड मुर्तीमध्ये सापडणे शक्य नाही, हे मानवाला का कळू नये?